महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कुटुंब ओळखपत्र (जॉबकार्ड) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दरवर्षी दि. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये पुढील आर्थिक वर्षाचे लेबर बजेट तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते. यामध्ये गावामध्ये घेण्यात येणारी कामे सुचविणे, त्यांचे प्राधान्यक्रम ठरविणे व चालू आर्थिक वर्षाचे सुधारित लेबर बजेट तयार करणे यांचा समावेश असतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2016-17 व सन 2017-18 यामध्ये मोठ्या प्रमाणात 11 प्रमुख कामे घेण्याबाबत प्रस्तावित होते. दि. 9 ऑगस्ट 2016 पासून पात्र लाभार्थ्यांना जॉबकार्ड नसल्यास त्यांना जॉबकार्ड देणे व जॉबकार्ड नुतनीकरण करण्याबाबतची मोहीम सुरु करण्यात आली होती. या अनुषंगाने ग्रामपंचायतीतील सर्व लाभार्थ्यांना कुटुंब ओळखपत्र (जॉबकार्ड) उपलब्ध करुन देणे. तसेच प्रस्तावित 11 कामांच्या लक्षांकावर काम करण्याबाबत रोहयो मंत्री यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचाना आवाहन केले होते. नरेगाच्या माध्यमातून नोंदणीकृत मजुराला/लाभार्थ्यांना कामाची हमी असून मोठ्या प्रमाणावर मत्ता निर्मिती राज्यात झाली आहे. गावातील छोट्या-मोठ्या स्वरुपाच्या अनेक मत्ता निर्मितीतून सबलग्राम व समृद्धग्राम निर्माण करण्यासाठी एक सुसंधी मिळालेली आहे. या संधीचे सोने आपण केले पाहिजे. येत्या दोन वर्षात सिंचन विहीरी, शेततळे, व्हर्मी कंपोस्टिंग, नाडेप कंपोस्टिंग, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, गाव तलाव/पारंपरिक पाणीसाठ्याचे नुतनीकरण व गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, रोपांची निर्मिती, वृक्ष लागवड, संगोपन व संरक्षण, ग्राम सबलीकरण (क्रीडांगण/अंगणवाडी/स्मशानभूमी सुशोभिकरण/ग्रामपंचायत भवन/गावांतर्गत रस्ते/घरकुल/गुरांचा गोठा/कुक्कुट पालन शेड/शेळी पालन शेड/मत्स्य व्यवसाय ओटे) या 11 बाबींवर शासन लक्षांकांच लक्षामध्ये व कोटीमध्ये कामे करणार आहेत. नरेगाच्या नियमानुसार लाभाची योजना नरेगाच्या नियमानुसार ही कामे मस्टरवर करावी लागतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब ओळखपत्र (जॉबकार्ड) आवश्यक आहे. या 11 कामांचा फायदा लाभार्थ्यांना घेण्यासाठी त्यांच्याकडे कुटुंब ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नाही त्यांनी हे कुटूंब ओळखपत्र तातडीने काढून घेतले पाहिजे. एखाद्या छोट्याशा शेतकऱ्याला विहीर, शेततळे किंवा शौचालय, फळबाग अशा स्वरुपाची लाभाची योजना मिळत असेल तर त्यासाठी कुटुंब नोंदणीपत्र तर हवेच. आपल्या गावातील प्रत्येक पात्र लाभार्थी नरेगाच्या कोणत्या ना कोणत्या योजनेमध्ये सहभागी होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार, मत्ता आपल्या गावामध्ये निर्माण होऊ शकतो. चला तर सर्व लाभार्थ्यांना कुटूंब ओळखपत्र (जॉबकार्ड) उपलब्ध करुन देवूया व वैयक्तिक लाभाच्या तसेच सामुहिक लाभाच्या पाहिजे तेवढ्या योजना गावासाठी आणूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातल्या ग्रामीण भागातल्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहूया. चला तर नरेगाच्या माध्यमातून आपले ग्राम सुजलाम सुफलाम करुया. ! - सुनीता कुपेरकर, विभागीय संपर्क अधिकारी. स्रोत - महान्युज