<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">आंध्र आणि ओरिसा या राज्यांतील एक वन्य जमात. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ७३,५९५ होती. आंध्रमध्ये पार्वतीपुरम्, पालकोंडा आणि सालूर तालुक्यांत जटापूंची वस्ती जास्त आहे.</p> <p style="text-align: justify; ">जटापूंमध्ये विविध कुळी आहेत. कुळींना प्राण्यांचे गणचिन्ह असते, उदा., थोरिका–रानकोंबडी, नवलिपित्ता–मोर इत्यादी.</p> <p style="text-align: justify; ">जमातीच्या प्रमुखास नायडू किंवा सामंथी म्हणतात. नायडूपद वंशपरंपरेने चालत आलेले असते. जमातीतील वैयक्तिक व सामाजिक तंटे मिटविण्याचे काम नायडू करतो.</p> <p style="text-align: justify; ">वधूमूल्य (व्होली) देण्याची पद्धत आहे. विवाहाचे बरेच प्रकार जटापूंमध्ये आढळतात. सेवा-विवाह, अपहरण-विवाह असेही प्रकार रूढ आहेत. विधवेच्या बाबतीत देवर-विवाह संमत आहे. तसे न झाल्यास पूर्वीच्या वरपक्षाला वधूमूल्य परत करण्याची प्रथा आहे. अलीकडे जटापूंमध्ये वरदक्षिणेचीही पद्धती रुजू होऊ लागली आहे. बहुतेक मृतांना पुरतात; पण सर्पदंशाने वा अपघाताने मृत्यु आल्यास दहन करतात.</p> <p style="text-align: justify; ">शेती ही जटिपूंचा मुख्य व्यवसाय आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार ५०% लोकांना स्वतःची जमीन आहे. त्या खालोखाल इतर लोक शेतमजुरी व जंगलातील अन्नसंकलन करणे हे व्यवसाय करतात. तांदूळ, रागी, भुईमूग व तंबाखू ही मुख्य पिके पिकवितात.</p> <p style="text-align: justify; ">जटापूंचे मुख्य सण गोडाळी, पांडुगो व अवगम पांडुगो हे आहेत. जाकारादेवी व दुर्गादेवी (ग्रामदेवता) ह्यांची ते पूजा करतात. त्या वेळी डुकरे, कोंबड्या किंवा मेंढ्या बळी देतात.</p> <p style="text-align: justify; ">आंध्रमधील जटापू प्रामुख्याने जटापू आणि खोंड भाषा बोलतात. ओरिसात जटापू कोया भाषा बोलतात.</p> <p style="text-align: justify; ">लेखिका : दुर्गा भागवत</p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत : <a class="external_link ext-link-icon" href="https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/component/content/article?id=11120" target="_blank" title="जटापू">मराठी विश्वकोश</a></p> </div>