नोंदी व इतिवृत्त पुस्तिका विसरू नका संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावातील आमच्या महिलांचे स्वयंसाहाय्य गट गेल्या तीन-चार वर्षांपासून चालू आहेत. आमच्या गावात एकूण सात बचत गट आहेत. गटामधील महिलांचा एकमेकांवरील विश्वास व पैशाची देवाणघेवाण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे. परंतु गेल्या वर्षी गटामध्ये एक अशी घटना घडली की, त्यामुळे महिलांच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण सिंधूताईंच्या सावधानीमुले ते संकट टळले. त्याचे असे झाले की, एकदा आम्हा महिलांची मिटिंग भरली होती. त्या मिटिंग मध्ये एका महिलेने दावा केला की, मी चार हप्ते भरले आहेत, माझे फक्त सहा हप्ते बाकी आहेत. व्याज तर मी वेळोवेळी देते, तर तुम्ही कसे म्हणता मी तीन हप्ते भरले? आता ती बरोबर बोलली की चुकली, हे कसे कळणार? म्हणून सिंधूताईंनी जुन्या नोंदी असलेली वही व नवीन नोंदी असलेली वही दोन्ही वह्या तपासून पाहिल्या तर त्या महिलेच्या नावावर तीन हप्ते भरल्याच्या नोंदी होत्या. त्या सर्व नोंदी सिंधूताईंनी तिला दाखविल्या. मग त्या बाईने सांगितले की, “मी महिन्याच्या महिन्याला व्याज भरत होते. पण हप्ता कोणत्याही महिन्यात भरल्यामुळे मी किती हप्ते भरले, हे काय माझ्या लक्षात राहिले नाही. पण तुमच्याजवळ असलेल्या नोंद रजिस्टरमुळे आता मला कळले की माझे सात हप्ते भरण्याचे बाकी आहेत. माझ्याजवळ असलेल्या पासबुकात पण मी नोंदी करून घेतल्या नाहीत. त्यामुळे माझा गोंधळ झाला.” या घटनेवरून सिंधूताईंच्या असे लक्षात आले की हप्ते भरण्यावरून बाईचा गोंधळ झालेला आहे, असा गोंधळ इतर महिलांचा होऊ नये म्हणून, पुन्हा एकदा सर्व महिलांना एकत्र बोलावून स्वयंसाहाय्य गटामधील नोंदी, अटी, नियम, तपशील आणि होशोब पुस्तिका व प्रोसिडिंग (इतिवृत्त) या विषयी सविस्तर माहिती दिली. ते सर्व वेळच्या वेळी लिहिलेले असावे. त्याची किती आवश्यकता असते हे त्यांनी स्वयंसाहाय्य गटातील उदाहरणाने समजावून सांगितले. आज सर्व प्रकारच्या नोंदी न विसरता गटामध्ये व्यवस्थित ठेवल्या जातात. व सभेचे इतिवृत्त सुद्धा नियमित लिहिले जाते. त्यामुळे गटामध्ये आता विश्वासाने कामकाज चालू आहे. गटातील सर्व कामकाजाविषयीच्या कच्च्यापक्क्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी ही गट प्रमुखाची असते. तसेच गटातील सर्व सभासद यांना गटामधील कामकाजाविषयी माहिती असणे आवश्यक असते. सभासदांकडे असलेल्या पासबुकामध्ये त्यांनी घेतलेले कर्ज, जमा केलेले हप्ते, त्यांनी केलेली बचत याविषयी सर्व नोंदी वेळच्या वेळी करून घेणे आवश्यक असते. दर महिन्याला होणाऱ्या मिटींगमध्ये सर्व कामकाजाचे इतिवृत्त लगेच लिहून त्यावर उपस्थित असणाऱ्या सदस्यांनी सही करणे आवश्यक असते. लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका