<div id="MiddleColumn_internal"> <h3>गरिबीच्या दुष्टचक्राचा भेद</h3> <p style="text-align: justify; ">दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर्यायी क्षेत्राची निवड करावयाची आहे.</p> <p style="text-align: justify; ">देशभरातील असंख्य गरीब महिला गटांनी हे सिद्ध केले आहे की, दर महा केवळ रु. १०/- बचतीमुळे सुद्धा मोठे चमत्कार घडू शकतात, जसे सखूबाईच्या जीवनात घडले.</p> <p style="text-align: justify; ">सूत्र ३ :</p> <p style="text-align: justify; ">सूचना :</p> <p style="text-align: justify; ">१. ‘सखुबाईंनी मार्ग काढला’ ही गोष्ट गटप्रमुखांनी वाचावी. जर आवश्यकता असेल तर हीच गोष्ट परत दुसऱ्यांदा वाचू शकता.</p> <p style="text-align: justify; ">२. सहभागी सदस्यांना गोष्टीचा विचार करण्यास सांगावे आणि गोष्टीत त्यांना कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात ते विचारावे. (चर्चेत जास्ती जास्त महिलांचा भाग असावा.)</p> <p style="text-align: justify; ">३.गरिबीच्या दुष्टचक्राचा तक्ता महिलांसमोर ठेवावा. चक्रातून बाहेर कसे येत येईल ह्यावर चर्चा करावी. (गटातील महिलांनी त्यांचे विचार मांडल्यावरच महिला समाजसेविका व गावातील महिला प्रवर्तक ह्यांनी सोबत दिलेल्या अहवालातला विषय ‘गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्याचा प्रयत्न’ ह्याचे स्पष्टीकरण दयावे. त्यामुळे राहिलेले मुद्दे स्पष्ट होतील.)</p> <p style="text-align: justify; ">४.ह्यानंतर गटातील सदस्यांना त्यांच्या जीवनात गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे अनुभव सादर करण्यास सांगावे.</p> <h3>सखुबाईंनी मार्ग काढला</h3> <p style="text-align: justify; ">सखूबाईकडे आता काहीच जमीन उरली नव्हती. कर्जाची परतफेड न केल्यामुळे सखुबाईंची बैलगाडीही राहिले नाही. अशा प्रकारच्या अडचणींना तोंड देणाऱ्या अनेक महिला त्या गावात होत्या. प्रत्येक जण आपल्या अडचणींविषयी एकमेकीशी बोलण्यास लाजत होती.</p> <p style="text-align: justify; ">एके दिवशी मीनाताई या सुशिक्षित व मनमिळाऊ बाई त्या गावात आल्या. त्यांनी काही महिलांना एकत्र केले व त्या महिलांशी बोलू लागल्या. आता ही पहिलीच वेळ अशी होती, की महिला आपल्या अडचणींविषयी एकमेकींशी बोलू लागल्या. मीनाताईंनी त्यांना सांगितले, जरी प्रत्येक महिन्याला प्रत्येकीनी १० किंवा २० रु. ची स्वतंत्र बचत केली, तरी तेवढयाने काहीच करता येणार नाही. पण गावातील अनेक महिला एकत्रित येऊन एकत्रित बचत केल्यास ४०० किंवा ५०० रु. अशी एकूण रक्कम प्रत्येक महिन्याला जमा होईल व तेच पैसे गटातील एखादया गरजू महिलेस कर्ज म्हणून दिले, तर तिची अडचण दूर होण्यास मदत होईल.</p> <p style="text-align: justify; ">गटामध्ये कर्जाची देवाणघेवाण व त्यातून उदयोगास सुरुवात.</p> <p style="text-align: justify; ">सखुबाईंची गटप्रमुख म्हणून गटाकडून निवड झाली. तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी कर्ज घेतले. त्या पैशातून त्यांनी कोंबडीची काही लहान पिल्ले पाळण्यासाठी घेतली व परसबागेसाठी काही बियाणे घेतले. हळूहळू इतर महिलांनीही गटाकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. साहजिकच त्या गावच्या महिलांमध्ये जेव्हा त्या एकत्र येऊन बचत करत, तेव्हा त्या आपल्या अडीअडचणींविषयी बोलत व एकत्रित विचाराने मार्ग काढत. आपले जीवन सुधारण्यासाठीच्या इच्छा व स्वप्नांविषयी बोलत. त्यांना आपल्या मागे संपूर्ण गटाची ताकद आहे असे वाटायला लागले व त्यामुळे आशाही वाटू लागली.</p> <p style="text-align: justify; ">सखूबाई व त्यांच्या कुटुंबाने कठिण परिश्रम केले आणि तीन महिन्यांतच प्रथम घेतलेल्या कर्जाची परतफेड केली. शिवाय आता त्यांच्या घरी अंडी व काही भाजीपाला होता. त्याच्या विक्रीतून त्यांना चार पैसे मिळत. पिल्लं मोठी झाल्यावर त्यांनी त्या कोंबड्या विकल्या आणि पुन्हा आणखी पिल्लं विकत घेतली. आता त्यांच्याकडे पैसा शिल्लक राहू लागला. गटाकडून मोठे कर्ज घेतले, तरीही ते परत करण्याची त्यांची क्षमता होती. दोन वर्षानंतर त्यांच्या कुटुंबाने गहाण पडलेली जमीन सोडवून घेतली.</p> <p style="text-align: justify; ">या प्रकारे महिलांचे व पुरुषांचे अनेक बचतगट गावात निर्माण झाले. हे समस्या सोडवण्याचे चक्र असेच चालू राहिले व हळूहळू इतर गावांतील महिलांनी या गावापासून प्रेरणा घेऊन बचत गट स्थापन केले.</p> <p style="text-align: justify; ">महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि सखूबाई तसेच त्यांच्या मैत्रिणी मुमताजबी, लताबाई, गंगूबाई शेजारच्या गावांतील महिलांना आपले अनुभव सांगण्यासाठी जाऊ लागल्या.</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; "><b>लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट</b></p> <p style="text-align: justify; ">स्त्रोत : <b>थेंबे थेंबे तळे साचे - पुस्तिका</b></p> </div>