अतिपाऊस, वादळ यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीत बचावासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयारी ठेवली असून पावसाळ्यापूर्वीच पूर, वादळ, आग, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीवर मात करुन जीवित व वित्त हानी कशी टाळता येईल, याबाबत प्रशिक्षण देण्यात येवून प्रात्यक्षिकाद्वारे रंगीत तालीम घेण्यात आली. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्यातरी आपत्तीतील विविध प्रकारची होणारी हानी कमी करण्यासाठी नागरिकांनीदेखील जागरूक राहणे गरजेचे आहे. पूरपरिस्थिती अथवा वादळ येण्यापूर्वी, आल्यानंतरच्या काळात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत थोडक्यात …पूरापूर्वी घ्यावयाची काळजी :उंच खांबाची बैठक टाकून नद्या व समुद्र किनाऱ्यालगत इमारती उभाराव्यात. पूर्वानुमानासाठी आकाशवाणी, दूरदर्शन वरील बातम्या ऐकत किंवा पाहत चला. अधिकाऱ्यांकडून दिलेल्या सूचनेनुसार धोक्याची ठिकाणे खाली करा, सोडून द्या आणि अधिक सुरक्षित स्थानी, ठिकाणी स्थलांतर करा. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होत असताना कंदील, बॅटरी, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, कपडे व कागदपत्रं जवळ ठेवा. कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र राहिल असे पहा. शक्य झाल्यास घरातील सामान घरात उंचावर ठेवा. गुरांना अधिक सुरक्षित ठिकाणी हलवा. पूरपरिस्थितीत घ्यावयाची काळजी सुरक्षित ठिकाणी राहून अचूक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा. सरकारी सुचनांचे पालन करुन सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हा. विद्युतप्रवाह बंद करा व उघड्या तारांना स्पर्श करु नका. पोहता येत असल्यास बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा. अपरिचित किंवा खोल पाण्यात जाऊ नका. पुरानंतरही नदीच्या पात्रात जाऊ नका. क्लोरीनयुक्त पाणी प्या. उकळलेले पाणी प्या आणि सुरक्षित अन्नसेवन करा. साठवलेल्या पाण्यात, डबक्यात किटकनाशके शिंपडा. आपत्ती सर्व्हेक्षण गटाला अचूक माहिती पूरवून सहकार्य करा. आपत्ती साधनसामुग्रीचे योग्य पद्धतीने, पद्धतशीरपणे वितरण करा. त्यासाठी स्थानिक मंडळ आणि स्वयंसेवक तयार करा. धोकादायक आणि मोडकळलेल्या घरात प्रवेश करुन नका. तुफान/वादळापूर्वी घ्यावयाची काळजी रेडीओ (आकाशवाणीने), दूरदर्शनवरील बातम्या उद्घोषणा ऐकत चला. मच्छिमारांनी समुद्रात प्रवेश करण्याचे साहस करु नये, आपले जहाज सुरक्षित ठिकाणी नांगरा. मिठागरे तयार करणाऱ्या मजुरांनी सुरक्षितस्थानी स्थलांतर करा. तुमच्या घराची दारे, खिडक्या मजबूत करा. गरजेच्या असणाऱ्या बॅटऱ्या, कंदील, खाद्यपदार्थ, पाणी, कपडे, आकाशवाणी इत्यादी वस्तू ताबडतोब वापरण्यासाठी तयार ठेवा. मौल्यवान वस्तू प्लॅस्टिक पिशवीमध्ये बंद करा आणि त्यांना घरच्या वरच्या बाजूवर (माखणीवर) वगैरे ठेवा. आपली वाहने सुसज्ज ठेवा. गरज भासल्यास आणखी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हा आणि प्राण्यांनादेखील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करा. वादळ, तुफान असल्यास पाण्याच्या प्रवाहापासून दूर जा. वृक्षांजवळ किंवा विजेच्या खांबांजवळ थांबू नका, वीज प्रवाह आणि गॅस प्रवाह बंद करा. घरातून बाहेर पडू नका, घराची दारे आणि खिडक्या बंद करा. नियंत्रण कक्षाकडून दूरध्वनीद्वारे अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, अफवांपासून दूर रहा. तुफान, वादळानंतर उद्घोषणेनंतरच बाहेर पडा. अपरिचित जलप्रवाहातून ये-जा करु नका. प्रथमोपचारानंतर जखमींना दवाखान्यात न्या, नंतर लगेचच अडकलेल्यांना वाचवा. विद्युतप्रवाह जिच्यातून वाहत आहे किंवा जी तार तुटलेली आहे/उघडी पडलेली आहे तिला स्पर्श करु नका. पडक्या इमारती जमीन दोस्त करा. पिण्यासाठी क्लोरीनयुक्त पाणी वापरा, साठवलेल्या आणि घाण पाण्यात निर्जंतूक शिंपडा. आपत्ती काळात वरील उपाययोजनांचा अवलंब केला तर होणारी जीवित व वित्त हानी आपणास काही प्रमाणात निश्चितच टाळता येईल. जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी. माहिती स्रोत: महान्यूज, शुक्रवार, ०३ जुलै, २०१५.